अटल सेतूसह सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी!
(AI Generated Image)
२१ ऑगस्टपासून अधिसूचना लागू; पर्यावरणपूरक वाहतुकीस चालना
मुंबई : राज्यातील इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अटल सेतू, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी लागू करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना २१ ऑगस्टपासून अमलात आली असून २२ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्रीपासून ती प्रत्यक्ष अंमलात आणली गेली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
शासनाने मोटार वाहन कर अधिनियम १९५८ अंतर्गत जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, इलेक्ट्रिक चारचाकी वाहने (M2, M3, M6 श्रेणीतील) तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या आणि खासगी इलेक्ट्रिक बसेसना (M3, M6 प्रकारातील) टोल करातून सूट देण्यात आली आहे.
हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून, राज्यातील पर्यावरणपूरक वाहतूक आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापराला चालना देण्यासाठी तो महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.